राजकीय

आजची लोकशाही राजकारण्यांनी घालवली का ?

धुळे** *मरणासन्न लोकशाही*** मत विकणारा मतदार आणि मत खरेदी करणारा पुढारी
लोकशाहीचा उघड्या बाजारात चाललेला लिलाव

“देश प्रथम, राष्ट्र प्रथम” अशी बोंब मारणारे राजकीय पक्ष आज उघडपणे मतदार विकत घेण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. आणि या स्पर्धेत दुर्दैवाने एक गट प्रचंड यशस्वी ठरत आहे, तो म्हणजे स्वतःला विकायला तयार झालेला मतदार. ही स्थिती लोकशाहीसाठी धोक्याची नाही, ती लोकशाहीच्या मृत्युपत्रावरची सही आहे.

आज निवडणुका म्हणजे विचारांची लढाई राहिलेली नाही, त्या दारू, नोटा, गॅस सिलिंडर, साड्या आणि खोट्या आश्वासनांची बोली बनल्या आहेत. पुढारी खुलेआम मत विकत घेत आहेत, आणि मतदार तितक्याच निर्लज्जपणे ते विकत आहे. या व्यवहारात देश, संविधान, स्वाभिमान सगळं तारण ठेवलं जात आहे.

लोकशाही बाहेरून कोणी मारत नाही,
ती मतदाराच्या हातून आत्महत्या करते.

निवडणूक आयोग, प्रशासन, यंत्रणा सगळेच जण जणू डोळे बंद करून उभे आहेत. कायदा कागदावर आहे, पण रस्त्यावर नाही. आचारसंहिता भाषणात आहे, पण व्यवहारात नाही. आणि या सगळ्या ढोंगात, लोकशाहीची शवयात्रा हळूच पुढे सरकत आहे.

महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा आहे असे आपण छातीठोकपणे सांगतो. पण आज दिसतो तो महाराष्ट्र स्वाभिमानी नाही, तो सौदेबाज आहे.
स्वाभिमानी महाराष्ट्र, लाचार महाराष्ट्र हा बदल कोणत्याही आक्रमणामुळे नाही, तर आपल्या सामूहिक चारित्र्याच्या ऱ्हासामुळे घडतो आहे.

महापुरुषांची नावे आज पुढाऱ्यांच्या तोंडात चघळली जात आहेत. त्यांच्या पुतळ्यांपुढे वाकणारे हात, मतदाराच्या हातात नोटा कोंबत आहेत. हे दुटप्पीपण फक्त राजकारण्यांचे नाही; तो सहन करणाऱ्या समाजाचाही अपराध आहे. महापुरुषांच्या विचारांचा अपमान इतका स्वस्त कधीच झाला नव्हता.

प्रश्न विचारायला हवा—
देशातील गद्दार कोण?
देशद्रोही तोच का जो सीमारेषेवर बंदूक उचलतो?
की तो ही गद्दार आहे, जो लोकशाहीला काही हजार रुपयांत विकतो?

*आजचा सर्वात मोठा देशद्रोह म्हणजे विवेक गहाण ठेवणे*

मतदार भिकारी नाही, पण त्याला भिकारी बनवण्यात राजकारणी यशस्वी झाले,हे जितके खरे आहे, तितकेच खरे हेही आहे की, मतदाराने ते स्वीकारले. जो आपला हक्क विकतो, तो उद्या हक्कांसाठी ओरडण्याचा नैतिक अधिकार गमावतो.
लोकशाही अजून संपलेली नाही.
पण ती अंत्यविधीच्या रांगेत उभी आहे.

आता दोष फक्त पुढाऱ्यांवर ढकलून चालणार नाही. कारण जो समाज अन्याय सहन करतो, तो एक दिवस त्याचा भाग बनतो. आणि जो मत विकतो, तो उद्या गुलामगिरीची तक्रार करण्याचा हक्क गमावतो.

आज नाही जागे झालो, तर उद्या लोकशाही मेल्यावर रडायलाही वेळ उरणार नाही……………………….
🙏